श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मुल्ला कुटुंबियांची सेवाभावी परंपरा; वारकरी बांधवांना बिस्किटे व चिक्कीचे प्रेमपूर्वक वाटप
संपादक दिलीप वाघमारे
लोणंद नगरीत मुक्कामी आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी बांधवांच्या सेवेसाठी मुल्ला कुटुंबियांच्या वतीने प्रेम, श्रद्धा आणि सेवाभावाने बिस्किटे व चिक्कीचे वाटप करण्यात आले.
वारकरी संप्रदायाची सेवा ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून ती साक्षात श्री विठ्ठलाची सेवा मानली जाते. याच पवित्र भावनेतून मुल्ला कुटुंबियांनी वारकरी बांधवांचे मनापासून स्वागत करत त्यांना अल्पोपहाराचे वाटप केले. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि त्यांच्या मुखातून निघालेला “ज्ञानोबा-तुकाराम”चा गजर हा या सेवाकार्याचा खरा पुरस्कार ठरला.
धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देणाऱ्या वारी परंपरेला अभिवादन करत मुल्ला कुटुंबियांनी हा सेवाभावी उपक्रम राबविला. समाजात सेवा, समता, बंधुभाव आणि एकोप्याची भावना अधिक दृढ व्हावी, हाच या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. याप्रसंगी नजीरभाई मुल्ला, महंमदभाई मुल्ला, अब्दुलसलाम मुल्ला, कय्युम मुल्ला, अकीब कच्छी, शाहरुख कच्छी, रेहान मुल्ला, दिपक बाटे,मनोज चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.


