शरद पवार यांचं नरेंद्र मोदी यांना विधान
शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार आहोत असं आश्वासन मोदी सरकार देतं आहे. मागची दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ आणली हीच मोदी गॅरंटी दिली अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली आहे. इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी मोदींना आव्हानही दिलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
“आदर्श घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हात आहे असा आरोप भाजपाने केला. भाजपाने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. त्यानंतर सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजपात गेले. त्यानंतर पंधराव्या दिवशी भाजपाचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचारी पार्टी असं म्हणाले, राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळ्याचा आरोप केला.” असंही शरद पवार म्हणाले तसंच यावरुनच आता शरद पवारांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिलं.
पंतप्रधान मोदींना आव्हान
आमच्यावर आरोप झाल्यानंतर मी मोदींना म्हटलं हिंमत असेल तर चौकशी करा. दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ द्या. मात्र पुढे काय घडलं? ज्यांच्यावर आरोप केले तेच आज भाजपासह जाऊन बसले. त्यामुळे भाजपा ही वॉशिंग मशीन झाली आहे. आधी आरोप करायचे, मग पक्ष प्रवेश देऊन त्यांना धुवून काढायचं अशी टीका शरद पवार यांनी लोणावळ्यातल्या त्यांच्या भाषणात केली. इतकंच नाही तर मोदींकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचंही ते म्हणाले.
मोदींकडून सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. झारखंड, दिल्ली या राज्यांत तेच घडलं. नोटीस द्यायची, समन्स बजावायचे आणि तुरुंगात टाकायचे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक होऊ शकते असंही शरद पवार म्हणाले.
“पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही. जवाहरलाल नेहरूंबद्दल काहीही बोललं जातंय. गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचं योगदान हे देश स्वतंत्र करण्यासाठी होतं. अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायचे असते. आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देतायेत. त्यात मोदींची गॅरंटी देतायेत, पण ही कोणाच्या पैशाने जाहिराती दिली जातेय. जनतेच्या पैशाने हे गॅरंटी देतायेत” अशी टीका शरद पवार यांनी केली.