धोम धरणात 32 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू.
कार्यकारी संपादक : आशिष चव्हाण
वाई तालुक्यातील धोम धरणात 32वर्ष तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.15रोजी दुपारी घडली. धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव मनोजकुमार महेंद्र पाल (सध्या रा. बोंडारवाडी, ता. महाबळेश्वर) असे आहे. त्याचा मृतदेह बाहेर काढल्याचे वाई पोलिसांनी सांगितले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की वाई सोमवार दि. १५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मनोजकुमार महेंद्र पाल (वय ३२) आणि त्याचा मित्र संदीप बापु शिंदे (वय २७) दोघेही (रा. बोंडारवाडी, ता. महाबळेश्वर) हे आपल्या दुचाकी वरुन वाई येथील धोम धरण पाहण्यासाठी आले होते. पण दुपारच्या वेळी कडक ऊन्हाची तिव्रता असल्याने हे दोघेही व्याहळी गावच्या हद्दीत असणाऱ्या धोम धरणात पोहण्यासाठी ऊतरले होते. मात्र, या ठिकाणच्या पाण्याचा तसेच साठलेल्या गाळाचा दोघांनाही अंदाज न आल्याने पाण्यात उडी टाकली. यावेळी मनोजकुमार पाल हा गाळात अडकल्याने तो गाळात खोलवर गेला. तो बराच वेळ वर न आल्याने शिंदे यांनी मदतीसाठी इतरांना गोळा करण्याचा प्रयत्न केला. वाई पोलिसांना माहिती दिली. वाई पोलीस दि.16 रोजी घटनास्थळी पोहचले. तेथील बोट चालकास घेऊन पोलिसांनी शोध मोहीम राबविण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान मृतदेह हाती आल्यानंतर वाई ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावरून संदीप शिंदे याने तक्रार दिली आहे.
नेमका काय प्रकार याची चर्चा
धोम धरणात युवक बुडल्याची घटना दि.15 रोजी घडली. त्याच दिवशी पोलीस ठाण्यास माहिती कळवली होती तर पोलिसांनी तातडीने का धरणात बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ट्रेकर्सना बोलवले नाही. दुसऱ्या दिवशी पोलीस बोट क्लबची बोट घेऊन शोध मोहीम राबवतात. त्यामुळे हे प्रकरण काही तरी वेगळंच वाटत असून ज्याने तक्रार दिली तो बुडलेल्याचा मित्र आणि तो पाण्यात उतरले, असे सांगितले जाते. गाळात अडकला तर त्याचा मित्र कसा बाहेर आला, यात काही तरी वेगळं प्रकरण असल्याची जोरदार चर्चा वाई तालुक्यात सुरू होती.


