आदर्श शाळा राजपुरी येथे पालक मेळावा व मा.राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या सौजन्यातून राजपुरी जिनियस २०२४ या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न.


वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

जिल्हा परिषद आदर्श शाळा राजपुरी चा आदर्श शाळेचा शैक्षणिक मेळावा श्री विठ्ठल मंदीर राजपुरी येथे संपन्न झाला. या मेळाव्याला राजपुरी व आंब्रळ गावातील विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षणप्रेमी नागरिक,माजी विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

मेळाव्याची सुरुवात प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते श्री.विठ्ठल- रूक्मिणीच्या पूजनाने करण्यात आली.मेळाव्यात आदर्श शाळेची संकल्पना, २४ भौतिक सुविधा व त्यांच्या निश्चित करण्यात आलेल्या जबाबदाऱ्या व त्याची पूर्तता यावर सविस्तर चर्चा करून प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

मा.राजेंद्रशेठ राजपुरे यांनी आदर्श शाळेच्या लोकसहभागातून करावयाच्या कामांचे केलेले नियोजन सांगून गावाच्या विविध विकास कामांसाठी राखून ठेवण्यात आलेला गावाचा एक लाखाचा ग्राम निधी आदर्श शाळेसाठी देण्याची घोषणा केली. गटविकास अधिकारी मा.मरभळ साहेब यांचे नेतृत्व व गटशिक्षणाधिकारी पळसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याने शैक्षणिक चळवळीत क्रांतीकारक बदल घडवून आणल्याचा उल्लेख करत..बदलत असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात एक निश्चित व्हिजन डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी लागेल असे सूचीत केले . गावातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेतून गुणवत्ता वाढावी म्हणून बक्षिस व्यवस्था व सहाय्यक शिक्षक नेमणूका करत असल्याचे त्यांनी सांगितले.काळ झपाट्याने बदलत आहे,तरुणांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शिक्षणातून गावाची ओळख बदलावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यासाठी जिल्हा बॅंकेच्या सुलभ शैक्षणिक कर्ज योजना ,आण्णासाहेब पाटील महामंडळाची व्यवसाय कर्ज योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजना याची सविस्तर माहिती देऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. अभ्यासासोबत विविध उपक्रम राबविताना शाळा

गावातील सर्व सामाजिक उपक्रम व उत्सवांमध्ये सहभागी होऊन मुलांच्यात चांगले सुसंस्कार रुजवित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.आज खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा चांगले काम करत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील शाळांमध्ये पटसंख्येची निर्माण झालेली अडचण चिंतेची बाब आहे.आपल्या शाळा आदर्श व्हाव्यात असे वाटत असेल तर शाळा व्यवस्थापन समिती व गावाने यासाठी योगदान दिले पाहिजे.यावेळी त्यांनी गुरेघर ग्रामस्थांनी शाळेच्या केलेल्या कामांचे कौतुक केले. शाळेने राजपुरी जिनियस स्पर्धा परीक्षेचा नवा पॅटर्न तयार करून एक नवीन संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.

ADVERTISEMENT

यावेळी मार्गदर्शन करताना तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. आनंद पळसे साहेबांनी मा.राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या सौजन्याने आयोजित राजपुरी जिनियस २०२४ या शाळेच्या स्पर्धा परीक्षेचा उल्लेख करुन शाळेने गुणवत्तेचा एक नवा पॅटर्न तयार केला आहे असे सांगितले. अशीच जिल्हा अणि राज्य पातळीवरही शाळेने मजल मारावी अशी अपेक्षा व्यक्त केली.विविध स्पर्धा परीक्षा व उपक्रमांमध्ये ‌तालुक्यातील शाळांची प्रगतीच्या दिशेने चालू असलेली वाटचाल महाबळेश्वर तालुक्याच्या उज्ज्वल भवितव्याचे संकेत असल्याचे ते म्हणाले.शाळांनी असेच उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करावी व शाळा आदर्श करण्यासाठी पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.श्री लक्ष्मण आंब्राळे – अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आंब्रळ यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कै.बाबुराव कोंडीबा राजपुरे गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्री विकास व रोहिदास बाबुराव राजपुरे यांजकडून शाळेला वाचनालयासाठी सुसज्ज असे ग्रंथालय पुस्तकां सह देण्याचे जाहीर करण्यात आले त्याची सुरुवात शाळेला नियमित दैनिक सकाळ व टाईम्स ऑफ इंडिया ही वृत्तपत्रे आजपासून मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊन करण्यात आली.श्री. स्वप्नील परदेशी अध्यक्ष रोटरी क्लब पाचगणी, बाजीराव राजपुरे,निलेश कळंबे यांनी स्मार्ट टीव्हीचे, हभप रविंद्र महाराज आंब्राळे यांनी फ्लेक्स प्रिंटींग व महादेव भिलारे यांनी मुलांना ट्रॅक पॅंट चे योगदान दिल्याबद्दल उपस्थितांचा सत्कार व धन्यवाद व्यक्त करण्यात आले.

राजपुरी जिनियस २०२४ या शाळा स्तरावरील ३०० गुणांच्या मूल्यांकनात इयत्ता १ली ते ८ वी मध्ये गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिके देण्यात आली.यामध्ये अनुक्रमे रुद्र संतोष राजपुरे ,वेदिका सुरेश राजपुरे ,माही सचिन राजपुरे , श्रीराज सुशिल राजपुरे , ओंकार सुरेश राजपुरे , वेदिका प्रशांत राजपुरे , क्षितीज राहूल महांगडे व वैष्णवी लक्ष्मण आंब्राळे यांनी आपल्या इयत्तेत प्रथम पारितोषिक मिळविले.

कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष संदीप राजपुरे,अजय पाटील राजपुरे,अशोक राजपुरे, शांताराम राजपुरे, भिमसेन राजपुरे,हभप रविंद्र महाराज आंब्राळे,पांगारीचे माजी सरपंच जानू पांगारे, विश्वास राजपुरे, वैभव काळे, सूर्यकांत घाडगे , दत्तात्रय राजपुरे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीचे सदस्य,पालक,माजी विद्यार्थी, ग्रामस्थ ,अंगणवाडी स्टाफ व शिक्षक उपस्थित होते.

मुख्याध्यापक अरविंद चोरट यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले, अमोल गायकवाड यांनी स्पर्धांचे महत्त्व सांगितले , भिमराव शिंदे यांनी सूत्रसंचालन, श्रीम.निलोफर सय्यद यांनी यादी वाचन व सौ. योगिता पोळ यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!