नकारात्मक शक्तीला बाजुला करणे गरजेचे; दत्ता कोहिनकर


 

वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

वाई : माणसांनी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. कारण ९९ टक्के आजार मनातील नकारात्मक शक्तींमुळे होत असतात. आपल्याला ज्या गोष्टीची भिती वाटते तेवढी ती भयावह नसते. ती गोष्ट करून पाहिल्यानंतरच कळते की आपल्या वाटत होती तेवढी ही गोष्ट मितीची नाही. त्यामुळे आपण सर्वांनी नकारात्मक शक्तीला बाजुला करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे येथील माईंड पॉवर ट्रेनरचे चेअरमन दत्ता कोहिनकर यांनी केले.

 

किसन वीर कारखाना कार्यस्थळावर सातारा येथील महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ, किसन वीर साखर कामगार कल्याण मंडळ, कारखाना व सातारा सहकारी साखर कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मनाची अमर्याद शक्ती व तणाव मुक्तीवर श्री. कोहिनकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ADVERTISEMENT

 

दत्ता कोहिनकर पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या, जवळची माणसे गेल्यामुळे बहुतांश माणसं डिप्रेशनमध्ये गेली. इतकी बिकट अवस्था झाली की माणसांना रात्रीची झोप येत नाही गोळ्या घ्याव्या लागतात. याचा परिणाम असा होणार आहे की भविष्यात बरीच माणसं मानसिकदृष्ट्या खचणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या पिढीकडे त्यांच्या लहानपणापासुनच लक्ष दिले तरच उद्याची पिढी सक्षम बनणार आहे. लहान मुलांना नुसता अभ्यासु किडा बनवु नका तर योग्य व्यायाम, आहार, खेळ याकडेही लक्ष देणं ही काळाची गरज बनलेली आहे. त्यांच्या मानसिकतेत बदल होण्याकरिता बाहेरची दुनिया कशी आहे, काय चाललं आहे, याचे ज्ञान त्यांना मिळणं गरजेचे आहे. पराभव पहिल्यांना आपल्या मनात होतो आणि नंतर रणांगणात होत असतो त्याकरिता आपल्यातील आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. आपले बाह्यमनं ज्या सुचना अंर्तमनाला देतं तसेच घडत असते असे सांगत त्यांनी मनाचा विचार करण्याचा वेग हा वाऱ्यापेक्षा जास्त असतो, त्यामुळे मन जे विचार करते तसेच आपल्या आयुष्यात घडत असते. माणसांनी ताणताणावातुन बाहेर पडण्यासाठी व स्वतःवर प्रेम करण्याकरिता दिवसातुन अर्धा तास तरी व्यायाम केलाच पाहिजे. व्यायाम तसेच योग साधना करणे ही सध्याच्या काळाची गरज झालेली आहे. श्री. कोहिनकर यांनी काही प्रात्यक्षिकांमध्ये कामगारांना सहभागी करून आपण दैनंदिन जीवनात कोणकोणते व्यायाम व योगसाधना केली पाहिजे हे दाखविले.

 

कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले की, कामगारांनी कामगारांकरिता जी क्रिडा संकुलाची मागणी केलेली आहे. याबाबत कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील हे शासनस्तरावर प्रयत्न करतील तसेच यासाठी कारखाना कार्यस्थळावर जागाही देण्याबाबत संचालक मंडळ कायम पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले.

 

कार्यक्रमाची प्रस्तावनेमध्ये कामगारांना विविध योजनांची माहिती कारखान्याचे लेबर ऑफिसर अरविंद शिंगटे यांनी दिली. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, वाई बाजार समितीचे संचालक दत्ताशेठ बांदल,सातारा येथील महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचे संजय कांबळे, श्री. चोरगे, कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!