भारत पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने कोल्हापुरात होणार कार्याचा गौरव; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार राहणार उपस्थित
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
कष्टकरी चळवळ क्षीण होत असतानाच श्रमिक मुक्ती दलाचे डाॅ. भारत पाटणकर हे धरण, दुष्काळग्रस्तांसाठी लढा देत आहेत. ५० वर्षांपासून त्यांचे काम सुरू असून ही एक उद्भत घटना आहे. अशा लढावू नेतृत्वाचा अमृतमहोत्सवानिमित्त ४ सप्टेंबरला कोल्हापुरात कार्यगाैरव सन्मान होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून लोक येणार आहेत, अशी माहिती डाॅ. भारत पाटणकर अमृतमहोत्सवी कार्यगाैरव समितीचे अध्यक्ष अॅड. कृष्णा पाटील यांनी दिली.
सातारा येथे शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. पाटील बोलत होते. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष काॅ. संपत देसाई, सचिव सुधीर नलवडे, विजय मांडके, बोंडारवाडी कृती समितीचे मोहन जगताप, राजू जाधव, दिलीप धनावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
काॅ. देसाई म्हणाले, श्रमिक मुक्ती दलाची स्थापना १९८२ ला झाली. डाॅ. भारत पाटणकर यांनी ५० वर्षांपासून महाराष्ट्रातील धरणग्रस्त, दुष्काळग्रस्तांसाठी लढे उभे करुन यशस्वीही केले. याचबरोबर त्यांचा सांस्कृतिक चळवळीतही सहभाग राहिला. विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील त्यांचे योगदानही मोठे आहे. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचा अभ्यास करताना डाॅ. पाटणकर यांना डावलता येणार आहे. असे व्यक्तीमत्व असणाऱ्या डाॅ. पाटणकर यांचा अमृतमहोत्सवानिमित्त ४ सप्टेंबरला सकाळी साडे दहा वाजता कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये कार्यगाैरव सन्मान होणार आहे.
कोल्हापुरातील हा सन्मान राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तर डाॅ. गोपाळ गुरू, मनिषा गुप्ते, वाहरू सोनावणे आणि डाॅ. जयसिंगराव पवार हे प्रमुख वक्ते असणार आहेत. या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने धरण आणि दुष्काळग्रस्त सहभागी होणार आहेत, अशी माहितीही काॅ. देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डाॅ. पाटणकर यांच्यावर संदर्भग्रंथ…
पत्रकार परिषदेत मान्यवरांनी डाॅ. भारत पाटणकर यांच्या कार्याचा गाैरव केला. तसेच वर्षभर महाराष्ट्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर आगामी काळात डाॅ. पाटणकर यांच्यावर संदर्भग्रंथ तयार करण्यात येणार आहे. यामध्ये तीन भाग असणार आहेत. ‘श्रमिक’चा आढावा, देशातील सामाजिक-आऱ्थिक चळवळ आणि डाॅ. पाटणकर यांचा परिवार व त्यांच्या कार्याचा आढावा यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर डाॅ. पाटणकर यांच्या कार्यावर एक फिल्मही बनविण्याचा विचार आहे, असेही या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.


