“माणुसकी अजूनही जिवंत आहे!” – गरीब विद्यार्थ्याला मिळाला नवा आधार, शिक्षणासाठी उजळली नवीन वाट
संपादक दिलीप वाघमारे
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मुळगाव अडसूळवाडी येथील गरीब कुटुंबातील मुलगा — शिक्षण थांबेल की काय, स्वप्न अर्ध्यावर तुटेल की काय अशा भीतीत होता. मात्र सध्या मुंबई, चेंबूर येथील पी. एल. लोखंडे मार्गावर स्थायिक असलेल्या या विद्यार्थ्याला योग्य वेळी माणुसकीचे हात पुढे आले आणि आयुष्याला नवा उजाळा मिळाला.
अविष्यात् ट्रस्ट, ठाणे यांनी अल्पावधीतच ₹३०,८७३/- इतकी आर्थिक मदत देत विद्यार्थ्याचे थांबलेले पाऊल पुन्हा शिक्षणाच्या मार्गावर पुढे नेले.
या प्रवासात अनेक देवदूत भेटले –
अनिल चाचर गुरुजी (जि.प. प्रा. शाळा, न्हावी) – प्रत्यक्ष भेट न होताही फोनवर दिवस-रात्र शंका निरसन करून विद्यार्थ्याला मुलाप्रमाणे आधार दिला.
दीपाली मॅडम – अवघड प्रक्रिया सोपी करून समजावून दिली, मायेचा हात दिला.
रमेश पवार सर (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी) – वडिलांचे मित्र असूनही कुटुंबाप्रमाणे साथ देऊन योग्य मार्गदर्शन केले.
मिलिंद बागुल सर – प्रथमच भेट झाल्यावरही मार्गदर्शनासोबत मेहनत, समानता, पालकांचा सन्मान आणि मदतीची शिकवण दिली.
विद्यार्थी अमर चौधरी (मुळगाव अडसूळवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव – सध्या स्थायिक मुंबई, चेंबूर) यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले —
“मी पुढील चार वर्षे फक्त मार्क्स आणि डिग्रीसाठी शिकणार नाही. कौशल्य विकसित करून समाजाने मला जसा आधार दिला तसाच मीही इतरांना देईन.”
कुणी कुणाला प्रत्यक्ष पाहिले नव्हते, पण प्रामाणिकपणा, चांगुलपणा आणि माणुसकी यांच्या जोरावर एका गरीब कुटुंबातील मुलाला आत्मसन्मान आणि शिक्षणासाठी बळ मिळाले.
यातून पुन्हा एकदा हेच सिद्ध झाले, मदतीचा हात पुढे करणारेच खरे देव आहेत.


