खंडाळा: मातापित्यांचा आधार बनाल तरच जीवन यशस्वी होईल,कोपर्डे येथे मातृतितृ दिन संपन्न.
खंडाळा (सातारा) प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे
मातापित्यांचा आधार बनाल तरच जीवन यशस्वी होईल
इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे,कोपर्डे येथे मातृपितृ दिन संपन्न.मुलांना घडविणे ही आई वडिलांची मोठी जबाबदारी आहे. माता प्रेम देते माया देते संस्कार देते आणि पित्याच्या धाकामुळे शिस्त लागते त्यामुळेच मुलांच्या आयुष्याला आकार मिळतो.मात्र मुलांनीही वृद्धापकाळात आईवडिलांची सेवा करणे गरजेचे आहे.ज्या घरात वृद्ध आहेत तिथे संस्कार प्रवाहित होतात,त्यामुळे त्या घराचा कोणीही कधीही पराभव करू शकत नाही.मातापित्यांची सेवा करून जीवनात त्यांचा आधार बनाल तरच जीवन यशस्वी होईल असे मत इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी व्यक्त केले.
कोपर्डे ता.खंडाळा येथील प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित’मातृपितृ पूजन दिन’ समारंभानिमित्त ‘ आई बाप समजून घेताना ‘या विषयावर ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापिका शारदा वायदंडे,शाळा समितीचे अध्यक्ष प्रसाद व्हावळ,रविंद्र शिंदे ,संजय शिंदे,सोमनाथ पारखे,पांडूरंग जाधव यांसह प्रमुख उपस्थित होते.
अलिकडच्या काळात माणसाच्या मनात माणसांबद्दलच प्रेम कमी वाटू लागले आहे त्यासाठी मुलांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. केवळ संपत्तीचा मोह धरून जीवन जगणे योग्य नाही तर मुले हीच आपली संपत्ती मानून त्यांच्या घडण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे. मुलांनी आयुष्यात कितीही मोठे होऊ द्या मात्र आपल्या आई वडिलांना विसरता कामा नये. तुमचे जीवन घडावे यासाठी मातापिता काबाडकष्ट करतात. त्यांचे कष्ट सार्थकी लावणे हे मुलांचे कर्तव्य आहे.आई वडिलांचा आधार बनण्यासाठी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद ठेवा. जीवनात संकटं आपणाला अडवायला येत नाहीत तर ती घडवायला येतात. संकटातून मार्ग काढला की यशाची दारे खुली होतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्वागत पंकज रासकर यांनी केले तर धैर्यशील शेळके यांनी आभार मानले.


