कृष्णाबाईच्या चैत्री यात्रेस पालखी मिरवणुकीने शुभारंभ!शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस, विविध कार्यक्रमांची पर्वणी 


 

कराड प्रतिनिधी : शंकर माने  कराडनगरीचे ग्रामदैवत श्री कृष्णाबाईच्या चैत्री यात्रा महोत्सवास मंगळवारपासून पालखी मिरवणुकीने दिमाखात शुभारंभ झाला. सहा दिवस चालणाऱ्या यात्रेचा शनिवार (दि. २७) हा मुख्य दिवस असून, प्रथेप्रमाणे नित्य पूजाअर्चा, विधी व धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाची पर्वणी आहे.

 

हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर आज सायंकाळी श्रीकृष्ण दत्तात्रय आवटे (पुजारी) यांच्या निवासस्थानातून ‘श्रीं’ची सवाद्य पालखी मिरवणूक निघाली आणि कृष्णामाई यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला. सुवासिनींनी पूजन केल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. कृष्णा-कोयना नद्यांच्या अपूर्व प्रीतिसंगमावर कृष्णा घाटावरील मंडपात पालखी येऊन विसावली. दरम्यान, कराडकर नागरिक व कृष्णामाईच्या भक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. मंडपात ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

ADVERTISEMENT

कृष्णाबाई यात्रा महोत्सवातील उर्वरित पाच दिवसात उद्या बुधवार, दि. २४ रोजी मंगलप्रभात समयी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री दिलीप गुरव यांच्या हस्ते ‘नवचंडी याग’ संपन्न होईल. दुपारी तीन वाजता भजन, सायंकाळी सात वाजता ‘गीत रामायण’ कार्यक्रम पार पडणार आहे. गुरुवार, दि. २५ रोजी दुपारी चार वाजलेपासून भजन, सायंकाळी ‘सुनहरी यादे’ कार्यक्रम. शुक्रवार, दि. २६ रोजी सायंकाळी चार वाजता हळदी कुंकू व सायंकाळी भजन होणार आहे. शनिवार, दि. २७ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून, सायंकाळी चार वाजता भजन होणार आहे. रविवार, दि. २८ रोजी सकाळी ढोल ताशांच्या गजरात कृष्णाबाईची पालखीतून नगरप्रदक्षिणा होणार आहे. ही मिरवणूक मंडपात आल्यानंतर सायंकाळी लळीत कीर्तन, वसंतपूजा व रात्री येसूबाईच्या यात्रेने कृष्णाबाई यात्रा महोत्सवाची सांगता होईल.

यात्रेनिमित्त जुने कृष्णाबाई सांस्कृतिक केंद्रात महाप्रसाद तर कृष्णाघाटावरील मंडपात बुंदी वाटप करण्यात येणार आहे. तरी, भाविकांनी यात्रेतील कार्यक्रम व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णाबाई उत्सव समितीचे अध्यक्ष आनंदराव पालकर यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!