मोरवाडी जिल्हा परिषद शाळेत ” विठुरायाच्या ” गजरात बालचमूचा दिंडी सोहळा संपन्न.
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
वारकऱ्यांच्या वेशभूषा तील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात जिल्हा परिषद शाळा मोरवाडी यांचा विठू माऊलीचा दिंडी सोहळा मोरवाडी गावात रंगला.

महाराष्ट्रातला सर्वात मोठया प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी व देहू येथून निघून पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीला – म्हणजेच आषाढ शुध्द एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात.

पंढरीची वारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे अध्यात्मिक सांस्कृतिक वैभव. लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर मुखी विठ्ठल नामघोष करीत उत्साहाने, आनंदाने शिस्तीत वारीत सामील होतात. हा भक्तिरसाचा वारसा विद्यार्थिनींनी मधे रुजविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवाडी ता. भोर याठिकाणी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एरव्ही शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुले मुली आज मात्र पांढरा कुर्ता आणि डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, डोक्यावर तुळस घेऊन वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.

“विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहानभूक हरली ” या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाई च्या भक्तीत यावेळी ज्ञान मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. हे बघून हे जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. वारकरी दिंडी,वृक्षदिंडी, पर्यावरण दिंडी अशा विविध दिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावात तरुण मंडळाकडून बाल वारकऱ्यांसाठी खाऊ वाटप करण्यात आले.
या दिंडी कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका वैशाली सुतार,
शिक्षक बाळासाहेब गायकवाड
उपशिक्षक सुरेश जाधव व अरुण होडशिळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवाडी केंद्र सारोळे आदी शिक्षक वृंद आणि वारकरी ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोरवाडी उपस्थित होते.


