जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; ई-केवायसी न केल्यास 15 मार्चनंतर रेशन होणार बंद
सातारा प्रतिनिधी शंकर माने | सातारा जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने देशातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी स्वस्त धान्य देखील देण्याची योजना चालू केलेली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे देखील बंधनकारक केले असून यासाठीची मुदत वेळोवेळी वाढवून दिलेली आहे. मात्र, आता ज्या कार्डधारकांनी ई-केवायसी केलेली नाही, अशांना १५ मार्चनंतर रेशन मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक वितरण विभागाच्या वतीने गोरगरिबांना स्वस्त धान्याचा लाभदिला जातो. मात्र, शासकीय कर्मचारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असेल आणि ते निदर्शनास आले तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात १७ लाख ६१ हजार ५७२ रेशनकार्डधारक असून आतापर्यंत १२ लाख ७७ हजार ०४७ कार्डधारकांनी ‘केवायसी’ पूर्ण केली आहे.
सातारा जिल्ह्यात 17 लाख लाभार्थी
सातारा जिल्ह्यात १७ लाख ६१ हजार ५७२ जण लाभार्थी असून १२ लाख ७७ हजार ४७ जणांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. शासनाच्यावतीने इ केवायसी करण्यासाठी अॅप उपलब्ध केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मोबाईलद्वारे करू शकतात.
15 मार्चनंतर रेशन होणार बंद
केवायसी नसेल तर रेशन देणे शक्य होणार नाही. यामुळे ४,६२७०४ जणांचे ‘केवायसी’अभावी रेशन बंद होऊ शकते. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची ‘केवायसी’ लवकरात लवकर करून घेण्याचे आवाहन केले आहे. काही अडचण असेल तर तसे जिल्हा पुरवठा विभागाला कळवावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
कोणत्या तालुक्यातील किती जणांची ई केवायसी बाकी?
जावली : 94682; बाकी : 23319
कराड : 343036; बाकी : 85129
खंडाळा : 64208; बाकी : 11009
खटाव : 172807; बाकी : 50524
कोरेगाव : 127131; बाकी : 25344
महाबळेश्वर : 39881; बाकी : 10320
माण : 136997; बाकी : 37637
पाटण : 216702; बाकी : 63931
फलटण : 176875; बाकी : 58042
सातारा : 273699; बाकी : 65793
वाई : 115554; बाकी : 24356
एकूण : 1761572; बाकी : 462704


