वारकऱ्यांची सेवा म्हणजेच ईश्वरसेवा — सूर्य सर यांचा भक्तिभावाने उपक्रम
संपादक दिलीप वाघमारे
भक्ती, समर्पण आणि एकात्मतेचा अद्वितीय संगम असलेल्या आषाढी वारी निमित्त देवाची आळंदीत दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल सखाराम शिंदे आणि सूर्यगीत अॅकॅडमीच्या वतीने हजारो वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.
गेल्या पाच वर्षांपासून आम्ही ही सेवा सातत्याने करत आहोत. संतांच्या शिकवणुकीवर आधारलेली ही सेवा म्हणजे आमच्यासाठी ईश्वरसाधनाचं माध्यम आहे. “आम्ही अन्न-पाणी देतो, पण वारकऱ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हे आयुष्यभर साथ देणारे असतात,” असे भावुक उद्गार विठ्ठल शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्राचा आत्मा म्हणून ओळखली जाणारी आषाढी वारी ही देशातील एक मोठी सांस्कृतिक चळवळ आहे. लाखो वारकरी आळंदीहून पंढरपूरकडे पायी चालत जातात. यामध्ये युवक, युवती, वृद्ध, अपंग, तसेच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरही सहभागी होतात.
“वारकऱ्यांची सेवा म्हणजेच ईश्वरसेवा, आणि हेच आम्ही गेली पाच वर्षे भक्तिभावाने करत आहोत,” असे सूर्य सर यांनी नम्रपणे सांगितले.
या सेवाभावी उपक्रमात सूर्यगीत अॅकॅडमीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, तसेच सिध्दीका शिंदे, प्रकाश मारोतीराव भालेकर, सुर्यकांत भालेकर यांचाही सक्रिय सहभाग होता. वारकऱ्यांना चहा, नाश्ता, अन्न व पाण्याची सेवा अत्यंत प्रेमभावाने देण्यात आली.
वारकऱ्यांचे म्हणणेच आहे, “आळंदीमध्ये येऊन ज्या प्रकारे प्रेम आणि आदर मिळतो, त्यातच आम्हाला खऱ्या अर्थाने विठ्ठल भेटतो.”


