शहीद दिनानिमित्त ‘व्यर्थ ना हो बलिदान’ देशभक्ती पुरस्कार प्रदान
पुणे प्रतिनिधी | एस.एन.नांदेडकर
भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या शहिद दिनानिमित्त तसेच वंदे मातरम संघटनेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘व्यर्थ ना हो बलिदान’ देशभक्ती पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या वेळी एअर मार्शल भूषण गोखले यांना जीवन गौरव पुरस्कार, मा. उल्हास पवार यांना राजकीय गौरव पुरस्कार, मा. महेंद्र पिसाळ यांना सामाजिक गौरव पुरस्कार, मा. सुधीर काळकर यांना शैक्षणिक गौरव पुरस्कार, मंगेश चिवटे यांना आरोग्य दूत गौरव पुरस्कार तर मा. चंद्रकांत पालकर यांना पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्व मान्यवरांना तुकाराम महाराजांची टोपी, उपरणे, तिरंगी पट्टी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याच अनुषंगाने शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी एस.पी. महाविद्यालय येथे स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. तसेच अलका चौक ते एस.पी. महाविद्यालय या मार्गावर मशाल रॅली काढण्यात आली. ‘वंदे मातरम’ गीत गाऊन उपस्थितांनी शहीदांना अभिवादन केले.
कार्यक्रमाला वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, शहराध्यक्ष अमोल जगताप, कार्याध्यक्ष मोहित काकडे, जिल्हाध्यक्ष जाहीर मुलानी तसेच राज घाटे, आकाश जामगे, राकेश तेलंगे, किरण केकाने, आदित्य मुंगळे, श्रीकांत पवार, आदित्य गुरव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एअर मार्शल भूषण गोखले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी देशासाठी प्राणार्पण करून स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. युवकांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन राष्ट्रहितासाठी कार्य केले पाहिजे. वंदे मातरम संघटनेने शहीदांना भारतरत्न देण्याची केलेली मागणी योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
महेंद्र पिसाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या क्रांतिकारकांचे बलिदान सर्वोच्च असून युवकांनी त्यांच्या विचारांवर चालत देश घडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तर उल्हास पवार यांनी शहीद दिनाचे महत्त्व अधोरेखित करत, अल्पवयात फासावर जाऊन क्रांती घडवणाऱ्या या वीरांचे स्मरण प्रत्येकाने ठेवावे, असे आवाहन केले.


