संविधान जागरातून समतेचा संदेश :-हृदयमानव अशोक
पुणे प्रतिनिधी | एस.एन.नांदेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कोरेगाव येथील द पुन्हा स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड बॉईज या अंध शाळेत सामाजिक समता सप्ताह व संविधान जागर व्याख्यानमाले अंतर्गत कवी, लेखक व दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांचे “आम्ही भारताचे लोक” हे प्रभावी सत्र उत्साहात पार पडले.
या वेळी बोलताना हृदयमानव अशोक म्हणाले की, भारतीय संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नसून ते मानवी मूल्यांचं अभेद्य सुरक्षा कवच आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची अंमलबजावणी आपल्या दैनंदिन जीवनात झाली, तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरं अभिवादन ठरेल, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
संविधान प्रस्ताविकेतील मूल्ये केवळ पाठांतरापुरती मर्यादित न ठेवता ती विचारात आणि आचरणात कशी उतरवावी, समाजभान कसं जागृत ठेवावं, तसेच “आम्ही भारताचे लोक” या संकल्पनेचा खरा अर्थ काय आहे, हे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सोप्या, रंजक आणि प्रभावी शैलीत उलगडून सांगितले.
कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी अमृत लोखंडे, मुख्याध्यापक दामोदर सरगम, ज्ञानेश पाटील, वरिष्ठ शिक्षक रंगनाथ गजरे, रामेश्वर खिळे, सुदाम दळवी यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर “आम्ही भारताचे लोक” सत्र रंगले आणि संविधान प्रस्ताविकेच्या सामूहिक वाचनाने कार्यक्रमाची सांगता झाली.सूत्रसंचालन रंगनाथ गजरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी मांडले.


