रिपाइं ‘आरपार’ ची लढाई करणार! ८ जागा लढवणारः दादासाहेब ओव्हाळ
उपसंपादक : दिलीप वाघमारे
सातारा, दि. ( प्रतिनिधी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार स्वप्नातला नोंदणीकृत रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया ( आं ) पक्षाच्या वतीने २८८ जागांपैकी १०० ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे. पहिल्या यादीत १०० जागांसह सातारा जिल्ह्यातील ८ जागांचा समावेश असून जिल्ह्यात कोणत्याही पक्षाशी युती – आघाडी न करता स्वबळावर आठ विधानसभा मतदारसंघात रिपाइंचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहेत, अशी माहिती रिपाइंचे महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी आज पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून दिली. शोषित, वंचित, दीनदुबळ्या, सर्वहारा वर्गाच्या न्याय्य हक्कासाठीची ही निवडणूक म्हणजे ‘आरपारची’ लढाई असणार असल्याचेही ओव्हाळ यांनी म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना विविध पक्ष, त्यांचे गट सक्रिय झाले असताना रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया ( आं ) पक्षाने जिल्ह्यातील आठही जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे राजकीय आखाड्यात रिपब्बिलकन पक्षाची दमदार ‘एंट्री’ मानली जात आहे. आज मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला पक्षाचे कामगार आघाडी जिल्हाध्यक्षचे जिल्हाध्यक्ष मदनबापू खंकाळ, वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ओव्हाळ, पक्षाचे जिल्हा यूवक अध्यक्ष सोमनाथ धोत्रे, मुस्लिम युवक आघाडीचे शाहीद कुरेशी, जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव उपाध्यक्ष प्रशांत शिवशरण सलीम शेख सलीम बागवान संतोष नलावडे महिला आघाडीच्या दामिनी निंबाळकर वनिता सगरे आयटीसी चे विशाल भोसलेआदी प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
बहुजनांच्या आणि मागासवर्गीयांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महायुती काम करत आहे. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक करु करु असे वारंवार सांगितले जात आहे मात्र स्मारक केले जात नाही. बार्टीसाठी भराघोस निधी देऊ असे सांगितले जात आहे परंतु निधी दिला जात नाही. उलट शिष्यवृत्तीसाठी, फेलोशिपसाठी तीन तीन वर्षे विद्यार्थ्यांना आंदोलने छेडावी लागत आहेत. मागासवर्गीयांच्या विकासाची जी महामंडळे आहेत त्यांचीही वाताहत सुरु आहे. अनुसूचीत जातीचे उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला जातोय. या आणि अशा पार्श्वपरिस्थितीत सर्वसामान्यांच्या हितासाठी, लोककल्याणासाठी सत्तेत जाणे आवश्यक आहे. त्यामुळेच रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया ( आं ) पक्षाने ही निवडणूक अत्यंत ताकदीने लढविण्याचा निर्धार केला आहे.
सातारा विधानसभा मंतदारसंघातून सोमनाथ धोत्रे, कराड उत्तर – महेंद्र गोतपागर, कराड दक्षिण – मुकूंद माने, संतोष भिसे. पाटणमधून राज चव्हाण, विकास कांबळे, वाईमधून अमित मोरे, पवन धायगुडे. कोरेगावमधून नितीन बोतालजी, मनिषा सोनावणे, माण येथून सनी खरात, तर फलटण या राखीव मतदार संघातून ॲड. राहूल अढागळे अशा नावांची दादासाहेब ओव्हाळ यांनी घोषणा केली .


