नसरापूर येथील घटनेचा ‘प्रहार’ आणि ‘रौद्रशंभु प्रतिष्ठान’कडून तीव्र निषेध; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
नसरापूर :- येथील एका निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण भोर तालुका हादरला असून, या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या क्रूर घटनेचा ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ आणि ‘प्रहार अपंग क्रांती संघटना’ तसेच ‘रौद्रशंभु प्रतिष्ठान’च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून, आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नसरापूर येथील घटना ही समाजाला काळिमा फासणारी असून यामुळे सर्वसामान्य जनतेत प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. अशा नराधमांना समाजात स्थान असता कामा नये. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे (भोर) अध्यक्ष बापू नथु कुडले, प्रहार जनशक्ती पक्षाचे (भोर) अध्यक्ष अजय कांबळे आणि रौद्रशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील गाडेपाटील प्रमुख उपस्थित होते.
यासोबतच भानुदास दुधाने, राजकुमार मोरे, राणी शिंदे, महादेव सुतार, महेंद्र सोनवणे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


